गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

वादळ

मनातलं वादळ पायाने शमवण्यासाठी ती बाहेर पडली खरी. पण ती कुठे चालली आहे, कशासाठी चालत आहे तिचा तिलाच  कळत नव्हत. वाट, मन सगळंच अंधारात हरवलं होत.
इतक्या सुंदर निसर्ग रम्य ठिकाणी येऊन ही  तिला त्याचा आनंद घेता येत नव्हता. आपल्याच विचारांमध्ये हरवून ती कधी समुद्रावर पोचली तिला तिचही कळल नाही. त्याची आठवण मनाला सारखी स्पर्श करून जात होती. इथे तो आज असायला हवा होता.
तो का नाही फोन उचलत आहे, का तिच्या कुठल्याच SMS ला उत्तर नाही पाठवत हे अगदी बुद्धीच्या पलीकडच होत. काय चालल आहे त्याच्या मनात? काय वाटत आहे त्याला? त्याला माझ्यापासून दूर जायचा आहे का? मग तो मला का नाही हे स्पष्ट सांगून टाकत? ते जास्त बर नाही का? असा दोघांनी हि अधांतरी कुठे तरी तरंगत राहायचं, काहीतरी निष्कर्ष काढत रहायचे, स्वतःच मनावरची खपली काढायची, स्वतःच त्यावर मलमपट्टी करायची, सारख स्वतःला स्वतःच्या ताब्यात ठेवायचं या सगळ्याचा खूप कंटाळा आला.
माझी काळजी घ्यायला कोणी तरी माझं हवं, अस तिला अलीकडे फार वाटायला लागल होत. अनेक वर्षांनी तो तिला या रुपात भेटला आणि ती तिचं सर्वस्व त्याला देऊन बसली. या आयुष्याच्या वळणावर कोणी तरी भेटेल अस तिला कधीच वाटलं नव्हतं. मुलं आपापल्या वाटेला लागली आणि ती जास्तच एकटी पडली. उमेदीची अनेक वर्ष एकटीच काढलेली असली तरी तेव्हा अनेक उदयोग असायचे.  ऑफीस,नाटकात काम, गाण, लिखाण, मुलांचे व्याप- एक कि दोन! त्या उमेदीच्या काळात अनेक पुरुष आयुष्यात आले.  वेगवेगळ्या रुपात. कधी लेबल असलेली कधी लेबल नसलेली नाती. कधी अट्टाहासाने तिने काहीना दूर लोटलं तर बर्याच  जणांनी तिला.
भावनांचं ओझ पाठीशी टाकून आपण चालत राहिलो. कधीच कोणाकडे तक्रार नाही केली एकट असण्याची. मुलांकडे ही नाही. त्यांना आपण एकट्यानेच वाढवल याची हि कधी जाणीव नाही करून दिली. आलेला प्रत्येक दिवसा नव्याने साजरा केला. मग आता हि घुसमट का? काय हव आहे मला? एक आधार, एक मायेचा स्पर्श, एक प्रेमाची उब? माझ म्हणता येईल असं एक माझ माणूस ? पण त्याला मी तेवढी हक्काची, त्याची वाटते का? त्याला खरच माझ्या बद्दल काही वाटत?
विचार करत करत ती वाळूवर बसली. समुद्राच्या लाटा कधी जवळ येऊन तिला स्पर्श करत होत्या तर कधी लांबूनच परतत होत्या. त्याचा मनातही अशाच  लाटा येत असाव्यात का?
त्याच्या   मनाचं  अस प्रतिबिंब पाहून  ती हरखून  गेली  आणि  त्याच्या जवळ जाण्यासाठी अजून थोडी समुद्रात चालत गेली आणि मग तिथे आत जाऊन तिने परत एकदा समाधी लावली . त्याच्या  जवळ असण्याचं  एक अद्भुत समाधान तिच्या चेहर्यावर विलसत राहीलं .

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

अस्तित्व

आयुष्यातले दिवसच्या दिवस रिकामे जातात. मी वाट पहात रहाते. कोणीतरी येईल, कोणीतरी फोन करेल, कोणीतरी माझ्या SMS ला उत्तर देईल. पण असं काहीच होत नाही. दिवस संपतो, संध्याकाळ होते. मनावर काजळी चढायला लागते, संध्याकाळ हळूहळू मनात शिरायला लागते. मन काहूरत. तुझ्याकडे सगळ ठीक असेल ना असं वाटायला लागतं. पण तुझ्याकडून उत्तराची वाट पहाण्यापलीकडे माझ्या काहीच हातात नसतं. कसं सांगू कसं असतं माझं हे एकटेपण? रितेपण सांगताना शब्द हि रिते होऊन जातात. उरतो मनात भावनांचा शून्यपणा, अंतरात एक खोल दाट पोकळी, आंतडयाच  पिळवटण आणि ह्रीदयाच मूक रडण. या सगळ्यांची समजूत घालता घालता मी थकून जाते. त्यांना सांगते मी शेवटी कि हे सगळं तू माझ्याबरोबर सतत असतोस म्हणूनच होत, तुझं माझ्यातलं जे अस्तित्व आहे त्याचच हे प्रकटीकरण आहे. या सगळ्यांची मी मग अश्रुनी समजूत घालते.एकटेपणाचच पांघरूण घेऊन रात्र हळूच मनात शिरते आणि या सगळ्यांना जोजवून झोपवते. तू उद्या नक्की येशील अस सांगितल्यावर ते सगळे शांत होतात आणि मग सकाळची स्वप्न मनात ठेवून तुझ्या आठवणींच्या कुशीत शिरून झोपून जातात.